नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी देशाला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील गलवान खोऱ्यातील संघर्ष समोर आला. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची, चीनमधून आयात बंद करण्याची मागणी होत आहे. पण सध्या याचा भारतीय औषध कंपन्यांना फटका बसत आहे. भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेला माल बंदरात अडकून पडला आहे. त्यामुळे औषध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतीय औषध कंपन्यांनी वरिष्ठ सरकारी कार्यालये आणि पंतप्रधान कार्यालयाला आयातीला मंजुरी देण्यासाठी साकडे घातले आहे. औषध निर्मितीसाठी चीनमधून मागवलेला कच्चा माल, द्रव्य, COVID-19 उपकरणे जवाहरलाल नेहरु बंदर आणि दिल्ली विमानतळावर अडकून पडली आहेत. एका वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली.
बंदरामधून हा माल बाहेर निघाला तर औषध कंपन्यांपर्यंत पोहोचू शकतो. पण आवश्यक मंजुरीविना हा माल अजून बंदरामध्येच आहे. आयातीला प्राधान्य देऊन झटपट मंजुरी दिली नाही तर ९० ते १०० टक्के उत्पादन कायम ठेवणे कठिण आहे तसेच करोनाच्या या संकटकाळात औषध पुरवठयाची साखळी सुद्धा विस्कळीत होईल असे औषध क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. औषध उद्योगाने तात्काळ सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली आहे. औषध क्षेत्रासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय चांगले आहेत पण आत्मनिर्भर व्हायला वेळ लागेल असे औषध क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणणे आहे.