नवी दिल्ली – सध्या बऱ्याच कार कंपन्या वाहनांचे सुटे भाग आयात करतात. या आयातीवरील आयातशुल्क वाढवून कंपन्यांना हे भाग भारतातच तयार करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येईल, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सियाम या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, सरकार हे आयात शुल्क एकदम वाढविणार नाही. हळूहळू आयात शुल्कात वाढ केल्यानंतर कार कंपन्या असे उत्पादन देशातच तयार करण्याचा प्रयत्न करतील.
याच कार्यक्रमात बोलताना सुटे भाग निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या प्रमुखांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत आम्ही आयात निम्मी करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होईल याबाबत आम्हाला शंका नाही. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कार तयार होतात. मात्र, या वाहनांचे सुटे भाग परदेशातून आयात केले जातात. त्यामुळे आयातीचा खर्च वाढतो. त्याऐवजी पूर्ण वाहन आणि सुटे भाग भारतातच तयार व्हावेत, याबाबत सरकार आग्रही आहे.
त्याचबरोबर देशातील वाहन विक्री वाढावी याकरिता जुनी वाहने मोडीत काढण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण काही आठवड्यांत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या वाहन खरेदीचे प्रमाण वाढेल असे सरकारला वाटते.