मुंबई – एक जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारने 2018 मध्ये प्लास्टिक बंदी केली होती. मात्र इतर राज्यांमध्ये प्लास्टिकचा वापर सुरुच होता. त्यामुळे महाराष्ट्रातील प्लास्टिकबंदीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता केंद्र सरकारने संपूर्ण देशात प्लास्टिक बंदी अधीसूचना काढल्यानंतर राज्य सरकार पुन्हा एकदा प्लास्टिक बंदी करणार आहे. त्यानुसार, एकदाच वापरला जाणार्या प्लास्टिकच्या वस्तूंचं उत्पादन, आयात- निर्यात, वाहतूक, विक्रीवर राज्यात बंदी असणार आहे.
2018 मध्ये प्लास्टिक बंदी करणारे देशातील एकमेव महाराष्ट्र राज्य होते. महाराष्ट्रात जरी उत्पादन बंद असले तरी शेजारच्या राज्यांमधून प्लास्टिक आयात होत असल्याने पूर्णपणे प्लास्टिक बंदी झाली नव्हती. या कालावधीत 10 ते 12 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. तसेच तीन हजार टन प्लास्टिक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. दुधाची प्लास्टिक बॅग, पाण्याची बॉटल, थर्माकोल यावर मात्र अद्याप निर्णय नाही. एक जुलैपासून प्लास्टिक बंदी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.