पुणे – शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या “ई-नाम योजने’ची राज्यातील 60 बाजार समित्यांमध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
राज्याच्या कृषी मंडळाच्यावतीने पुढाकार घेतल्यान ही योजना यशस्वीपणे राबविण्यात यश आले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला देशात बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही प्रणाली उपयुक्त आहे. या प्रणालीमुळे शेतकरी आपला माल ई-नामद्वारे देशभरात विकू शकणार आहे.
या ई-नाम प्रणाली मार्फत शेतकरी ई-ट्रेडिंग करू शकतात. त्यामुळे आता ऑनलाइन व्यवहार होऊन शेतकऱ्यांना जागेवरच मालाचे पैसे मिळणार आहेत. ई-नाम प्रणाली मध्ये सहभागी झाल्यानंतर इंटर मंडी आणि इंटरस्टेट या दोन स्तरावर ई-लिलाव प्रकिया राबविण्यात येणार आहे. त्यातून शेतकरी राज्यात व देशात कुठलेही माल विकू शकणार आहे. केंद्र शासनाच्यावतीने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र तेलगंणा तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ई-नाम अंतर्गत ई-ट्रेड सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याबाबत येथील बाजार समितीच्या संचालकांचे प्रशिक्षण सुद्धा घेण्यात आले आहे. महाराष्ट्रा राज्य पणन महामंडळाचे संचालक डॉ. किशोर तोष्णिवाल यांनी याबाबत पुढाकार घेऊन बाजार समितीच्या कायद्यातील तरतुदींमध्ये सुद्धा बदल करण्यात येत आहेत.