अकोलेतील 21 गावांतील युवकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
अकोले – आढळा खोऱ्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवावा, अशा मागणीचे तालुक्यातील 21 गावांतील युवकांच्या आढळा कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देताना शिष्टमंडळात दत्तात्रय सहाणे, सहदेव कोळगे, गोरख कदम, संग्राम आंबरे, श्रीकांत आंबरे, वाळीबा मेंगाळ, अक्षय बोंबले, साईनाथ रेवगडे, बाळासाहेब मधे, देवराम मेंगाळ, ऍड. प्रवीण वाळुंज आदींचा समावेश होता. कृष्णावंती नदीचे अतिरिक्त पाणी आढळा नदीत सोडणारे पाऊल शासनाने उचलावे व नदीजोड प्रकल्प राबविण्याचे शासकीय धोरण राबवणारे आश्वासन द्यावे. याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा, असे दत्रात्रय सहाणे म्हणाले.
अनेक वर्षांपासून आढळा भाग हा दुष्काळाचा सामना करतो आहे. त्यामुळे हे तुटीचे खोरे बनले आहे. आढळा नदीवरील देवठाण धरण हे 1060 दशलक्ष घनफूट क्षमतेने पूर्णपणे भरत नाही. परिणामी आढळा धरणाच्या परिसरातील या पाणलोट क्षेत्रातील गावांना दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. या परिसरातील कृषी अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे.
येथील जनजीवन हे कृषीवर आधारित असून, हा एकमेव मार्ग त्यांच्या उपजीविकेचा पर्याय उपलब्ध आहे. नैसर्गिक कारणाने पावसाचे झालेली कमी प्रमाण, या कारणामुळे आढळा धरण पूर्ण क्षमतेने गेल्या काही वर्षांपासून भरलेले नाही. त्यामुळे या परिसरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांची स्थिती ही हलाखीची आहे. पाणी हा सर्वांत मोठा प्रश्न बनला असून, यावर काम करण्यासाठी काही सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन आपल्या शेतकरी बापाला न्याय मिळवून देण्यासाठी आढळा कृती समिती स्थापन केली आहे.
कृष्णवंती नदीवरील वाकी धरणाच्या वरील बाजूस वारंघुशीजवळ 2581 फूट समुद्र सपाटीपासून उंची आहे, तर आढळा नदीवर टाहाकारी गावाच्या खालील बाजूस 2458 फूट उंची आहे. म्हणजे 123 फुटांचा उतार असून, दोन्हींचे समतल अंतर सरासरी तलांकाने 22 कि. मी. बोगदा प्रस्तावित करून 13 कि. मी. समतलांकाच्या वारंघुशी ते मान्हेरे ते लाडगावचे मधून उगलेवाडी ते बाभूळवंडी ते आढळवाडी मधून शेरणखेल मधून नायकरवाडी जवळ माथा ओलांडून टाहाकारी जवळ आणले जावे. अथवा वारंघुशी ते मान्हेरे ते लाडगावमधून उगलेवाडी ते बाभूळवंडी ते चांगदेववाडी ते आढळा खोऱ्यात सांगवी जवळ आणले जावे. अथवा प्रवरा नदीच्या पुराचे पाणी या खोऱ्यात आणावे असे हे तरुण म्हणाले.