मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणामुळं राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर आलं आहे. विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारला सतत धारेवर धरण्यात येत आहे. या प्रकरणांचा आधार घेत खासदार नवनीत राणा यांनी राज्यात कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना साकडं घातलं आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करणारं पत्र भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवल्याचं सांगितलं होतं. राणे यांच्यापाठोपाठ आता, खासदार नवनीत राणा यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती लागू करण्यासाठी अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे.
खासदार नवनीत राणा यांनी 8 मार्च रोजी अमित शाह यांना पत्रं लिहिलं आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा उल्लेख नवनीत राणा यांनी पत्रात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नवनीत यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे.