मुंबई – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून विरोधी पक्ष भाजपकडून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला अटक झाली. या मुद्दावरून भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ‘अमित शहा यांना मी पत्रपाठवून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. ठाकरे सरकार राज्यातील परिस्थितीत हाताळण्यास अपयशी ठरत असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात मी मागणी केली आहे. ३ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत मी अमित शहांना पत्र लिहिले आहे’, असंही नारायण राणेंनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत या केसेस सचिन वाझेंनी हाताळल्या. सचिन वाझेंना या केसेसवर कुणाला तरी वाचवण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. आता सचिन वाझेंना अटक केली आहे. सचिन वाझेंची चौकशी मनसुख हिरेन केस बाबतच नाही तर याआधीच्या त्यांनी हाताळलेल्या केस बाबतही पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी राणेंनी केली आहे.