रेडा – दैनिक प्रभातमधून सामाजिक राजकीय, शैक्षणिक व सामाजिक जाणिवेतून वार्तांकन प्रसिद्ध होत असते. त्यामुळे राज्यात निःपक्षपाती म्हणून दैनिक प्रभातकडे पाहिले जाते. मी सहकारमंत्री असताना दैनिक प्रभातमधील संपादकांच्या सूचनेनुसार, मंत्रालयातील पत्रकारांची आसन क्षमता वाढविण्याची भूमिका घेतली. त्यामुळे चांगल्या जडणघडणीत दैनिक प्रभात वाटचाल करीत आहे, असे गौरवोद्गार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
मंगळवारी (दि. 5) इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात दैनिक प्रभातच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील, इंदापूरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, रिपब्लिकन पार्टीचे नेते शिवाजी मखरे, शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे, जनता बॅंकेचे शाखाधिकारी सुनील कुमार धुमाळ, बॅंक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक अजितकुमार चौरशीया, युवक नेते सचिन चौगुले, विशाल चव्हाण, हमीद अत्तार, संतोष लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांचे स्वागत दैनिक प्रभातचे इंदापूर तालुका प्रतिनिधी नीलकंठ मोहिते, गोकुळ टांकसाळे, सुरेंद्र शिरसठ, रामदास पवार, संदीप सुतार, बाळासाहेब कवळे यांनी केले. दैनिक प्रभातच्या विशेष पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
“माझ्या राजकीय जीवनामध्ये दैनिक प्रभातचा अनुभव व चांगल्या कामासाठी पाठबळ सातत्याने लाभलेले आहे.बिगर राजकीय दैनिक म्हणून सडेतोड लिहिण्याची परंपरा प्रभातने कायम जपली आहे. इंदापूर तालुक्यात सातत्याने घडणाऱ्या घटनांचा मागोवा निःपक्षपाती पणे प्रभातमध्ये प्रसिद्ध होत आहे. डिजिटल प्रभात तालुक्यातील नागरिकांना आपलासा करत आहे. ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना, परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला अभ्यासक्रम प्रभातमधून सालाबाद प्रमाणे प्रसिद्ध होत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबर स्पर्धा करत आहे.”
– माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
“माझी सामाजिक क्षेत्रातील सुरुवात व राजकीय क्षेत्रात काम करताना दैनिक प्रभातने कायम साथ दिलेली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचे मुखपत्र न ठेवता सामाजिक जाणिवेतून लिखाण करण्याची किमया दैनिक प्रभात करत आहे. त्यामुळे वर्तमानपत्राच्या गर्दीतदेखील दैनिक प्रभातचा वाचक दर्दी आहे.”
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस