सुरेश डुबल
कराड – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. परिणामी उसाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी ऊस तोडणी घेण्यासाठी धजवेना.
चार दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम मध्य महाराष्ट्रावरही झाला आहे. त्यामुळेच सोमवारपासून येथे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी पहाटेपासून जिल्ह्यात कमीजास्त प्रमाणात पाऊस पडला. येणाऱ्या तीन दिवसात चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
आधी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस, त्यानंतर परतीचा अनपेक्षित पडणारा पाऊस यामुळे शेतकरी चांगलाच वैतागला होता. दिवाळीनंतर पाऊस परतल्यानंतर, पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करण्यासाठी शेतकरी उठून उभा राहिला. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा एकदा अस्मानी संकट शेतकऱ्यांभोवती फिरू लागले आहे.
यंदा आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील ऊस पट्यावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे यावर्षी कारखाने जास्त काळ चालणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी यंदा महिना- दीड महिना उशिरा कारखान्याची धुराडी पेटली. धुराडी पेटताच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊसतोड घेतली. अशा परिस्थितीत सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी व ऊसतोड कामगार यांच्यावर आता अस्मानी संकट पुन्हा एकदा गडद झाले आहे. त्याचा थेट परिणाम मंगळवारी पहावयास मिळाला.
मंगळवारी पहाटेपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा झाला. मुख्यतः सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरु आहे. मात्र पावसामुळे शेतातील ऊसाची तोडणी करता येत नसल्याने तोडणीमजूर आपआपल्या छावणीत बसून आहे. तर ज्या शेतकऱ्यांना शेतात ऊसतोड सुरू होती तो शेतकरी चिंतातूर होता. मंगळवारच्या पावसामुळे सोमवारी ज्या ऊसाची तोडणी केली होती त्या उसाची वाहतूक शेतातून बाहेर काढताना वाहन व बैलगाडी धारकांची दमछाक होत होती.
आज बुधवारी पाऊस जरी थांबला असलातरी आभाळ मात्र दाटून आलेले होते. त्यामुळे पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांची गाळण उडत होती. हवेत आलेला गारवा, अचानक येणारा वारा अन अधूनमधून होणारा पावसाचा शिडकावा त्यामुळे बुधवारीही शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ऊस तोडणीबरोबर शेतीची बरीचशी कामे खोळंबली आहेत. तालुक्यातील भात काढण्याही काही ठिकाणी बाकी आहेत.
या पावसामुळे त्यावरही संकट आले आहे. याशिवाय खरिपातील पिके निघालेल्या शेतातील रब्बीच्या हंगामाची तयारी करता येईना झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार हा पाऊस तीन दिवस राहणार असल्याने चिंता आणखी वाढली आहे.
ऊसतोडीसाठी शेतकरी धजवेना…
ऊस गाळप कारखाना शेतकऱ्यांना ऊसतोड देण्यास तयार आहे. तरीही सध्या असलेल्या वातावरणामुळे शेतकरी मात्र आपल्या शेतात ऊसतोड घालण्यासाठी धजावत आहे. जर का कारखान्याची ऊसतोड आली, अन् पावसाला सुरुवात झाली तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्याला असल्याने तो आपल्या शेतात कारखान्याची उसतोड घालू देत नाही. ही परिस्थिती अजून तीन-चार दिवस तरी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.