प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
राजेगाव- दौंड, कर्जत, इदापूर, करमाळा या तालुक्यातील काही भागांना उजनी धरण वरदान ठरले आहे. परंतु, उजनी धरणातील पाणी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचे गंभीर परिणाम पाण्याबरोबरच उजनीतील जैववैविध्यावर होत आहेत. उजनीच्या उथळ पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या नद्याच्या पात्राला याचा फटका बसत आहे.
उजनी धरणाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस उपया योजना अद्याप तरी करण्यात आलेली नाही, अशीच स्थिती राहिली तर याचे भविष्यात प्राणीमात्रांसह, नागरिकांना परिणाम भोगावे लागणार आहेत. नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील जनतेची तहान भागवणाऱ्या उजनी धरणाच्या प्रदूषणात वाढ होत झाल्याने भविष्यात याचा गंभीर परिणाम होणार आहे. धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी पाणथळ जागी पाणी दुषित असल्याचे निदर्शनास येते. काही ठिकाणी पाण्यावर असलेले तवंग सहजपणे दिसून येतात.
उजनीचे वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय असताना प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत गेल्या काही वर्षात काहीच भूमिका घेतलेली नाही. उजनीची सुरक्षितता राम भरोसे असल्याचे यावरून स्पष्ट होते.
उजनीच्या प्रदूषणाला नागरिकच कारणीभूत आहेत. कारण, भीमानदीपात्रात वडापच्या सहाय्याने लहान-मोठे मासे पकडले जातात. हे मासे नदी किनारी लाखोंच्या संख्येने वाळवले जातात, त्यामुळे अधिक दुर्गंधी पसरते. पावसाने तसे वरील धरणांतून विसर्ग सोडला जात असल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व घाण, राडारोडा उजनीत येवून थोपतो आहे. औद्योगिक क्षेत्राच्या नावाखाली अनेक मोठ्या कंपन्या प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त दुषित पाणी नदीत सोडत असल्याने हे पाणी थेट धरणात येवून मिसळत असल्याने याचाही परिणाम होत आहे.
- लहान मत्स्यबिजाचा उपसा….
खानोटे, वाटलूज, राजेगाव हद्दीत भीमानदी पात्रात प्रदुषण जाणवत आहे. यासह परप्रांतीय नदी पात्रात लहान जाळ्याच्या सह्याने मासेमारी करून लहान मत्स्यबिजही उपसून त्याचे वाळवण काठवर टाकत असल्याने यातूनही प्रदुषण वाढत आहे. मात्र, प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे.