नवी दिल्ली – चौथ्या तिमाहीतील विकासदर पाच वर्षांच्या निच्चांकावर गेला आहे तर सरलेल्या वर्षातील बेकारीचा दर 45 वर्षांच्या उचांकावर गेला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी मात्र ही मंदी अल्पकालीन असल्याचे म्हटले आहे.
गर्ग यांनी सांगितले की, गेल्या वर्षात बिगर बॅंकिंग वित्तीय क्षेत्रात म्हणजे एनबीएफसीमध्ये भांडवल असुलभतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे भांडवलाचा वापर कमी झाल्यामुळे विविध क्षेत्राच्या उत्पादकतेवर आणि विस्तारीकरणावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मात्र, आता रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार या पेचातून शक्य तितक्या लवकर मार्ग काढणार आहे. त्यामुळे भांडवलसुलभता वाढून विविध क्षेत्राची उत्पादकता वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.