नवी दिल्ली – टाळेबंदी वर्षांत प्रवासी वाहन विक्रीला फटका बसला आहे. या संपूर्ण वित्त वर्षांत चारचाकी वाहनांच्या विक्रीत 2.24 टक्के तर दुचाकीत 13.19 टक्के घसरण नोंदली गेली आहे.
प्रवासी वाहन विक्री 2.24 टक्क्यांनी रोडावून 27.11 लाख झाली आहे. तर दुचाकी विक्री 13.19 टक्क्यांनी घसरून 1.51 कोटी झाली आहे. आधीच्या वित्त वर्षांत चारचाकी व दुचाकीची विक्री अनुक्रमे 27.73 लाख व 1.74 कोटी होती.
गेल्या आर्थिक वर्षांत देशात 5.68 लाख वाणिज्य वापराची वाहने विकली गेली. आधीच्या वित्त वर्षांच्या तुलनेत त्यात यंदा 20.77 टक्के घसरण झाली आहे. तर 2.16 लाख तीनचाकी वाहनांची विक्री झाली. या वाहन प्रकारातील घसरण थेट 66.06 टक्के आहे. सर्व गटातील वाहने मिळून देशात गेल्या आर्थिक वर्षांत 1.86 कोटी वाहनांची विक्री झाली आहे. वार्षिक तुलनेत त्यात 13.6 टक्के घसरण नोंदली गेली आहे.
गेल्या वित्त वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत प्रवासी वाहने वगळता इतर सर्व गटांतील वाहन विक्रीत घसरण झाल्याचे सिआमचे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले. त्यातही तीनचाकी वाहन विक्रीला अधिक फटका बसल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात – मार्चमध्ये मात्र सर्वच गटातील वाहन विक्रीत जवळपास दुप्पट विक्री झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.