मुंबई : नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. त्यातच चक्रीवादळामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच भागात रात्रीपासून सकाळपर्यंत पावसाच्या हलक्या स्वरुपाचा सरी पडत आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा , काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.
ढगाळ वातावरणामुळे आधीच मोहोर काळवंडला आहे. त्यातच आंबा आणि काजू पिकावर मोहोर तसेच फळधारणा होताना अवकाळी पाऊस पडत असल्याने कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळामुळे कोकणात अवकाळी पावसाचा परिणाम जाणवत असून हवामान विभागाकडून पुढील चार दिवस अलर्ट जारी केला आहे.
अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदोस चक्रीवादळामुळे कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, काजूला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त आहे.
यंदा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने सुरु असल्याचे म्हटले जात आहे. तर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे फवारणीवर होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा ताळमेळ देखील बसत नाही. या स्थितीमुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.