नवी दिल्ली – देशभरात करोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. सध्या नवीन करोना रुग्णांमध्येही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी लस टोचून घ्यावी यासाठी सरकराकडून आवाहन करण्यात येत आहे. करोना लसीबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत.
लस घेतल्यानंतर करोना व्हायरसपासून किती दिवस संरक्षण मिळते? याचे दुष्परिणाम आहेत का? असे प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. त्यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डाॅ. गुलेरिया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
‘करोनाविरोधी लस घेतल्यानंतर आठ ते दहा महिन्यापर्यंत करोना व्हायरसपासून संरक्षण मिळते. तसेच त्याहून अधिक काळ देखील संरक्षण मिळते,’ असे डाॅ. गुलेरिया यांनी सांगितले आहे. तसेच भारतात दिल्या जाणाऱ्या लसीचे कोणतेही मोठे दुष्परिणाम नाहीत असेही त्यांनी सांगितले आहे.
कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन्ही करोनाविरोधी लसीच्या परिणामकारकतेविषयी बोलताना गुलेरिया म्हणाले, ‘जर आपण दोन्ही लशीवर नजर टाकली तर ती समान अॅंडीबाॅडी तयार करतात आणि खूप मजबूत आहेत’
दरम्यान, आतापर्यंत देशात चार कोटीहून अधिक जणांनी लस घेतली आहे. सर्व नागरिकांनी आपल्या जवळील आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.