पुणे – रांगोळीच्या पायघड्या, फुलांची, गुलाल-भंडाऱ्याची उधळण आणि ‘मोरया’चा जयघोष अशा अतिशय उत्साही आणि भावपूर्ण वतावरणात पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले. मनाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन सकाळी साडेअकरा वाजता तर मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी झाले. त्याचबरोबर शहरातील इतर प्रमुख मंडळांच्या विसर्जनाची जोरदार तयारी सुरू असून, भविकांमध्येही गणेशविसर्जनासाठी उत्साह असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी झाले मानाच्या गणपतींचे विसर्जन :
* मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जन – सकाळी 11.30 वाजता
* मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळ – सकाळी 11.35 वाजता
* मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ – दुपारी 12.30 वाजता
* मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती- दुपारी एक वाजता
* मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा – दुपारी एक वाजून 15 मिनिटांनी
गणरायाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी –
अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला निरोप देण्यासाठी पावसानेदेखील हजेरी लावली. शहरातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून कडक ऊन आणि दुपारी अचानकपणे आलेल्या पावसामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. पऊस पडत असतानाही, अतिशय उत्साहाने आणि मनसोक्तपणे नृत्य करत,गणेशभक्तांनी आपल्या लडक्या बप्पाला निरोप दिला.
तुळशीबाग गणपती विसर्जनावेळी वाद –
करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार यंदा विसर्जनप्रसंगी मिरवणूक न काढण्याचे तसेच ढोल ताशा वादन न करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले होते. मात्र तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल-ताशे वाजवले जात असल्याने, पोलिस त्याठिकाणी पोहोचले आणि ढोल-ताशे वाजवणाऱ्यांचे साहित्य जप्त केलं. यानंतर तिथे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या झालेल्या चर्चेनंतर जप्त केलेले साहित्य पुन्हा परत देण्यात आले. दरम्यान तुळशीबाग गणपती मंडळावर पोलिसांनी कारवाई केली नसून, फक्त समज दिली असल्याचे मंडळाचे खजिनदार नितीन पंडित यांनी सांगितले.