राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ भेटले इंदापूर तहसीलदारांना
रेडा-इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात प्रचंड प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने उभी असणारी शेतातील पिके व फळबागा नेस्तनाबूत झाले आहेत. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे पूर्ण करा, अशी मागणी इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, बहुउद्देशी पिके तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे. तर इंदापूर तालुक्यामध्ये मागील काही वर्षात पर्जन्यमान कमी होते. त्यामुळे शेती पिकली नाही आणि आता शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती फुलवली असताना पावसामुळे नाहक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. परिपूर्ण पंचनामे करावेत अशा सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत. ज्या भागातील शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांना विलंब लागत आहे, त्यांनी संपर्क साधावा असेही आवाहन तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केले आहे.
नुकसानीचे पंचनामे केले जावेत अशी विनंती करून इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने चर्चा केली व लेखी निवेदन दिले. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सचिन सपकळ, तात्यासाहेब वडापुरे, ज्येष्ठ नेते संपत पवार, देवीदास भोंग, अभिजीत गुरव, राजाराम सागर, प्रताप गाढवे, सतीश पांढरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.