शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी
मुंबई : राज्यामध्ये कोणत्याही पक्षाला बहूमत सिद्ध करता आले नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंददेखील करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणारी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष लवकरात लवकर सुरु करावा तसेच गोरगरीब जनतेला तात्काळ मदत करावी अशी मागणी या दोन्ही पक्षाने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र लिहून हा कक्ष सुरु करावा अशी मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यपालांनी या पत्राची दखल घेत राज्यातील हजारो गरीब रुग्णांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे. तर, दुसरीकडे शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. हा कक्ष तात्काळ चालू करावा यासाठी शिवसेनेचे उपनेते उदय सामंत मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच सुटत नसल्यामुळे अखेर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. याचा सर्वात जास्त फटका राज्यातील रुग्णांना बसत आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी मदत बंद झाली आहे. रुग्णांच्या शस्त्रक्रिया तसेच इतर वैद्यकिय उपचार रखडले आहेत. त्यामुळे हा कक्ष लवकर सुरु करावा अशी मागणी केली जात आहे.