अर्थराज्यमंत्री ठाकूर यांच्याकडे खासदार बापट यांची मागणी
पुणे – ‘ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन रुपी बॅंकेचे तत्काळ विलीनीकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेला करावी,’ अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे. बापट यांनी दिल्ली येथे ठाकूर यांना याबाबतचे निवेदन दिले.
‘रुपी ही 108 वर्षे जुनी बॅंक असून मागील चार वर्षे बॅंकेने समाधानकारक कामगिरी केलेली आहे. बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रश्न गेले सात वर्षे रिझर्व्ह बॅंकेकडे प्रलंबित आहे.
बॅंकेचे गुंतवणूक आणि ठेवीदार यांच्या आता सहनशक्तीचा कळस झाला आहे. त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान न होता तत्काळ निर्णय होणे अपेक्षित आहे,’ असे बापट यांनी निवेदनात म्हटले आहे.