नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची तातडीची बैठक उद्या (सोमवार, 17 फेब्रुवारी) मुंबईत बोलावली आहे. या बैठकीत नेमकं काय घडणार, याकडे राज्याचे डोळे लागले आहेत. यासाठी जळगाव दौऱ्यावर असलेले पवार मुंबईला परतले आहेत.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एनआयएकडे तपास सुपूर्द करणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचे सांगताना पवारांच्या बोलण्यात नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर फक्त राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे असे राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री उपस्थित राहतील. राज्यातील वकील परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी शरद पवार नाशिकमध्ये येणार होते. मात्र जळगाव दौरा आटोपून नाशिकला आल्यानंतर ते थेट मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान, कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात माहिती लपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. राज्य सरकारकडून तपास काढून घेणे अयोग्य असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. तसेच जळगाव दौऱ्यावर पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर मात्र सावध प्रतिक्रिया दिली होती.