कवठे – वेळे एमआयडीसीबाबत वाई येथे शनिवारी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र स्थानिक वेळे येथील शेतकऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटला आहे.
दरम्यान, तलाठी यांच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ वाई गाठली. परंतु जिल्हाधिकारी उशिरापर्यंत आल्याच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नसेल तर एमआयडीची रद्द व्हावी तसेच पुन्हा अशी मिटिंग घ्यायची असेल तर सात दिवस आधी माहिती कळवावी, असे निवेदन शेतकऱ्यांनी वाई प्रातांधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान, अखेर जिल्हाधिकारी वाई विश्रामगृहात येताच तिथे सर्व शेतकऱ्यांना बोलावले आणि एमआयडीसी व्हावी की नाही ते विचारले.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला आमची जमीन द्यायची नाही असे सांगितले. यातील काही शेतकरी अल्प भूधारक शेतकरी आहेत, जमीन देऊन पुन्हा काय करू, असे सांगू लागले. कित्येक वर्षे शिक्के पडून असल्यामुळे सोसायटी तसेच बॅंकेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाही, फक्त अडवणूक केली जात आहे, तर ते शिक्के काढून एमआयडीसी रद्द करून टाका, असे शेतकरी सांगू लागले. तर काही शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत, काही दिवसांपूर्वी अर्ज भरून दिले आहेत. 1.50 कोटी रुपये हेक्टरी दर शेतकऱ्यांना द्यावा तरच आमची जमीन एमआयडीसीला देऊ असे सांगितले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, दोन्ही बाजूंचा शेतकऱ्याना पुढील आठवड्यात मिटिंगसाठी बोलवू. ज्या शेतकऱ्यांना जमीन द्यायची नाही अशी वेगळी लिस्ट काढू आणि ज्यांना द्यायची आहे त्यांची वेगळी लिस्ट काढू, त्याचा रिपोर्ट शासनाला कळविला जाईल, बागायत जमिनी व ज्यांना जमीन द्यायची नाही अशा शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार नाही, परंतु दर काय मिळेल हे मी सांगू शकत नाही. शेतकरी फसला जाऊ नये, योग्य दर मिळत नाही तोपर्यंत शेतकरी एकजूट राहून शासन दरबारी कशी फसवणूक होती. याची अनुभूती बोगदा भूसंपादनात शेतकऱ्यांनी अनुभवली आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे.
प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मिटिंग घेतली तर बाधित शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यावरून शेतकरी प्रचंड निराश आहेत हे स्पष्ट होते. यावेळी वेळे गावातील शेतकरी व माजी सरपंच दशरथ पवार, प्रकाश धर्माजी पवार, संतोष रघुनाथ पवार, प्रवीण वामन पवार, पृथ्वीराज पवार, शिवाजी जाधव, अतुल हणमंत पवार, दीपक शिवाजी पवार, उत्तम ढमाळ यांचेसह अनेक बाधित शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.