सातारा -केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव करोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात नेणारा आहे.
बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कांद्याचे उत्पादन करणारा शेतकरी गरीब आहे. करोनाच्या संपूर्ण देशाला सावरण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. देशाला अन्नधान्य व भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. जगभरातून कांद्याला मोठी मागणी असताना निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे.
https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/posts/1857006784438489
देशांतर्गत दर कोसळल्यावर कांदा फेकून द्यावा लागतो; परंतु आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना, असा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी. या निर्णयाबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहे. लॉकडाउनच्या संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार आता कुठे सावरत असताना अचानक केलेली निर्यातबंदी घातक ठरेल.
याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदारांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था कांद्यावर अवलंबून आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने व्यापक हित लक्षात घ्यावे, अन्यथा अचानक केलेल्या निर्यात बंदीमुळे भारताच्या निर्यात धोरणाला फटका बसू शकतो.