जैव सुरक्षा प्रयोगशाळेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद
पुणे – पुण्यात उच्चश्रेणीची जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्याला राज्याच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली असून, यामुळे जनावरांपासून मनुष्यात संक्रमित होणाऱ्या “बर्ड फ्लू’सारख्या घातक रोगांच्या विषाणूचे तातडीने निदान शक्य होणार आहे.
औंध येथे या “बीएसएल-3′ (बायो सेफ्टी लेव्हल) दर्जाच्या प्रयोगशाळेच्या उभारणीच्या पशुसंवर्धन विभागाच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली असून सोमवारी अर्थसंकल्पातील तरतुदीच्या माध्यमातून राज्य सरकारनेही हिरवा कंदील दाखवला आहे. प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी सुमारे 70 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, केंद्र सरकार 60 टक्के, तर राज्य सरकार 40 टक्के निधी देणार आहे. येत्या दीड ते दोन वर्षांत ही प्रयोगशाळा घातक विषाणूच्या निदानासाठी सज्ज होईल, असा विश्वास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून “बर्ड फ्लू’ रोगाने धुमाकूळ घातला आहे. या रोगाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर या रोगाचे तातडीने निदान व्हावे, यासाठी पुण्यात उच्च श्रेणीची जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी सोमवारी अर्थसंकल्पात केली. या प्रयोगशाळेमुळे पक्षी, जनावरांपासून मनुष्यात संक्रमित होणाऱ्या बर्ड फ्लू, टीबी, रेबीज, जंत, सराह, लेप्टोस्पायरोसिस सारख्या रोगांमधील विषाणूंचे निदान करता येईल, असे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने या प्रयोगशाळेचा आराखडा तयार केला असून पशुसंवर्धन विभागाच्या आवारातच ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. हा निधी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाईल, असे डॉ. परकाळे यांनी सांगितले.