मुंबई – राज्यात येत्या पाच दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान मुंबई केंद्राने वर्तवला आहे. त्यानुसार 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यात जास्त प्रमाणात उष्णता असण्याची शक्यता आहे. यादरम्यान, नागरिकांनी दुपारच्यावेळी उन्हात जाणे टाळावे, अशा सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरत असल्याचे दिसत आहे. भिवंडीत तापमान 39 डीग्रीवर पोहोचले आहे. पुढील तीन दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि गुजरात राज्याकडून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Heat wave conditions very likely to prevail in isolated pockets of North Madhya Maharashtra and Marathwada from 30th March.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/cu8e4zSzpM
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 28, 2022
महाराष्ट्रातील जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी अन्य जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र जाणवेल, असा अंदाज वर्तवला आहे. तसेच मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, विदर्भ, राजस्थान आणि दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 29 ते 31 मार्चदरम्यान उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यात 29 मार्च ते 31 मार्च हे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्माघातापासून बचाव व उपाय योजनेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
उष्णतेच्या लाटेत उष्माघातासारख्या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन पालिका प्रशासन व आरोग्य विभागास देखील सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना देखील उष्णतेच्या लाटेत उपायोजना राबवण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.