मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करतील हे आता निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आजपर्यंतची जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडली आहे म्हणून आता आपण उद्यापासून बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आता माझी जबाबदारी संपली आहे. आता मी माझ्या दुसऱ्या कामाला लागेन. उद्या पासून मी पत्रकार परिषदाही घेणार नाही. माझं याबाबतीतलं काम झालेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे अखेर संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांचं सत्र बंद होणार आहे.
राऊतांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने जे अघोरी कृत्य केले होते, त्याची शिक्षा महाराष्ट्राने त्यांना दिली आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यात असले अघोरी प्रकार चालत नाहीत हे महाराष्ट्रान दाखवून दिलं आहे, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे ‘सामना’वीर संजय राऊत यांनी दररोज पत्रकार परिषदा घेत भाजपच्या नाकी नऊ आणले होते.