नैसर्गिक संकटाशी सामना करण्यासाठी जुन्नर-आंबेगावच्या द्राक्ष उत्पादकांची बैठक
नारायणगाव-एकमेकांना आधार देत, “”मी लढतोय तू बी लढ, आपण सर्व जण मिळुन या नैसर्गिक संकटाचा सामना करू आणि ही लढाई जिंकू” असा विश्वास देत जुन्नर व आंबेगाव द्राक्ष उत्पादकांची बैठक गुंजाळवाडी (आर्वी) येथे पार पडली.
या बैठकीत सध्य स्थितीतील अडचणी आणि उपाययोजना यावर द्राक्षतज्ञ मंगेश भास्कर यांनी मार्गदर्शन केले. सर्वानुमते एक निवेदन तयार करून शासन स्तरावर पाठपुरावा करुन योग्य ती मदत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची प्रातिनिधिक समिती स्थापन करण्यात आली. अवेळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जगावं का मरावं? अशी अवस्था झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाने ज्या पिकासाठी पिक कर्ज घेतले ते पिकच राहिले नाही… तर पिक कर्ज कोठून भरणार ?.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे 100 टक्के नुकसान झाल्याने पिकांसाठी घेतलेले पीक कर्ज आत्ता कोठून भरायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. यामधे यावेळी प्रकाश वाघ, विकास दरेकर, गणेश कोल्हे, सचिन पवार, राजीव आवटी, सुरेश बोरचटे, रामदास यादव, संजय वाघ, शरद फापाळे, हरिभाऊ वायकर, राहुल डोंगरे, जयसिंग वायकर, नितीन भोर, शेतकरी उपस्थित होते.
- पीकच नाही तर कर्ज कोठून भरणार?
ज्या पिकासाठी कर्ज घेतले ते पिकच राहिले नाही… तर पीक कर्ज कोठून भरणार?, म्हणून प्रथमतः राज्य शासनाने सर्वच पिकांचे पिक कर्ज संपूर्णतः माफ करावे, सरसकट कर्जमाफी होईल; तेव्हा होईल परंतु निदान या वर्षासाठी घेतलेले पिक कर्ज तरी त्वरित माफ करावे, म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक आधार होईल. तसेच पिक विमा योजना ही विमा कंपन्यांच्या हिताची असून फसवी आणि चुकीची आहे, ती शेतकरी हित जोपासून तयार करावी, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.