महाळुंगे इंगळे – खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीतील वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने दुतर्फा उभी केली जात आहे. परिणामी वाहतूककोंडीला निमंत्रण मिळत असून, या रस्त्यावरून प्रवाशांना प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे धोकादायक पद्धतीने रस्त्यालगत उभी करण्यात येणारी अवजड व धोकादायक वाहने तातडीने हटवावीत, आणि बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर रस्ते कंपनी व पोलीस प्रशासनाने तातडीने कायदेशीर व कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी खालुंब्रे ग्रामपंचायतीचे सदस्य देवराम तुळवे व उद्योजक चंद्रकांत तुळवे यांनी केली आहे.
खालुंब्रे, वासुली फाटा हद्दीत असणाऱ्या बहुतांश कंपन्यांच्या पुढे, तर कामगारांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या मुख्य चारपदरी रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस ती वाहने अडथळा ठरत आहे. चाकण एमआयडीसीत एमआयडीसीचेच चार टप्पे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. परंतु यापैकी सर्वच ठिकाणी बाहेरून येणारी अवजड वाहने, कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसेस आणि अन्य वाहने भर रस्त्यातच अस्ताव्यस्त उभी केली जात आहे.