जालना – जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी महामार्गाचे कंत्राटदार माॅन्टे कार्लो लि या कंपनीला 328 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन टप्प्यात 328 कोटींचा दंड ठोठावला आहे. कंत्राटदार मॉन्टे कार्लो लि या कंपनीने दंडाच्या विरोधातील आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ती काल कोर्टाने फेटाळली आहे. तर यापूर्वीच औरंगाबाद खंडपीठाने देखील यासंदर्भातील तीन वेगवेगळ्या याचिका फेटाळल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळ्याने कंपनीला दंड भारावाच लागणार आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात परवानगीच्या मर्यादेपेक्षा कंपनीने जास्त गौण खनिजाचे उत्खनन केले होते. यांदर्भात समितीने अहवाल सादर केला. त्यावरून तहसीलदारांनी मॉन्टे कार्लो कंपनीला 165 कोटी, 87 कोटी व 77 कोटी अशा तीन टप्प्यांत एकूण 328 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
दरम्यान, मुंबई-नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्च महिन्यापर्यंत समृध्दी महामार्ग काहीअंशी सुरू होण्याची शक्यता आहे. मागील अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 700 किमी पैकी 500 किमीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे कॉम्प्रेड रिजिड सिमेंट पेव्हर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा महामार्ग बनविण्यात आला आहे. याशिवाय, नागपूर – मुंबई दरम्यान 701 किमीच्या या मार्गावर कुठेही गतिरोधक नाही. या माहामार्गाची वेगमर्यादा 180 किमी प्रति तास बनविण्यात आली आहे.