नगर: राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी परिसरातील नदी पात्रातील लिलावाच्या नावाखाली बेसुमार अवैध वाळूउपसा होत असल्याची तक्रार शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील वेणूनाथ जयराम वाघ याच्या मालकीच्या गट नंबर 100/4 मधून वनकुटे (ता.पारनेर) येथील राहुल देवराम जाधव यास 250 ब्रास माती मिश्रित वाळू उचलण्याची परवांनगी देण्यात आलेले आहे. या गटातून 2 जून ते 28 जून या कालावधीत 250 ब्रास माती मिश्रीत वाळू उत्खनन करण्याचे अनेक अटी व शर्तींच्या अधीन राहून अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे यांनी परवानगी दिलेली आहे. परंतु परवांनगी दिलेल्या गटातून वाळू उपसा न करता बाजूच्या मुळा नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा राजरोस सुरू आहे.
या ठिकानाहुन दररोज 70 ते 80 वाहनामधून चार ब्रास पेक्षाही जास्त ब्रास वाळू डंपरने वाहतूक होत आहे. 28 दिवसात 250 ब्रास माती मिश्रित वाळू उत्खननाचे हे परवानगी असून याठिकानाहुन दिवसाला 250 ब्रास पेक्षा अधिक वाळू उत्खनन केले जात आहे. या वाहनांवर महसूल, पोलीस व आरटीओ विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नासल्याचे भोर यांनी सांगितले.
सरकारी मालमत्तेवर दरोडाच
जोपर्यंत प्रशासनाकडे कोणाची तक्रार येत नाही. तोपर्यंत प्रशासनानेही त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करायची. हा एक प्रकारचा सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहकार्याने दरोडाच आहे. दैनंदिन नोंदवही, नियमित तपासणी, आठवड्याला उत्खननाचा सर्व तपशील प्रशासनाकडे सादर करणे अशा कुठल्याही अटींचे पालन केले जात नाही. व प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आर्थिक हितसंबंधातूनच हा अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचा धंदा सुरू आहे असल्याचे भोर यांनी सांगितले.