देहुरोड – तीर्थक्षेत्र देहूतील तुंबलेले ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे. आता पुण्याच्या पार्श्वभूमीवर पावसाच्या रुद्रावतारानंतर झालेल्या परिस्थितीने देहूकर धास्तावले.
पुण्यासह मावळामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार निर्माण केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पावसाने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांनी रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. खड्डेमय रस्ते बनले आहेत. नदी-ओढे, नाले-गटारी यावर नागरिकांनी अतिक्रमणे केल्याने नदी, ओढे, नाले अरूंद होत आहेत.
याशिवाय बांधकाम करताना कोणत्याही प्रकारची टाउन प्लॅनिंग नाही, तसेच स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षाने गुंठा-दोन गुंठ्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी जागा मिळेल तिथे अतिक्रमण केले आहेत. बेकायदेशीर बांधकाम केली आहेत. जागेला सोन्याचा भाव असल्याने इंचभर जागा न सोडता बांधकामे केली
जात आहेत.
ओढ्या नाल्यावरील अतिक्रमणाने गटाराचे स्वरूप आले असून, नाले-गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी गटारी, नाल्यातून बाहेर येत दुर्गधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहेत. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाने डोळझाक केले आहे. तर बेकायदेशीर बांधकाम पावसाच्या वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण करत असल्याने आणि नागरिकांच्या घरात
शिरत आहेत.
देहूगाव परिसरातील गृहप्रकल्पांना, बांधकामांना परवानगी देताना प्रत्यक्ष रस्त्याची, जागेची, नदीपात्रातील अतिक्रमणे, पूर नियंत्रण रेषा तसेच क्षेत्राची पाहणी न करता “पीएमआरडी’ तसेच टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी हितसंबंध जोपासत बांधकाम व्यवसायिकांना मंजुरी, परवाने देत असल्याने शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत बेकायदेशीर बांधकामे मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
याशिवाय रस्ता, वॉटर हार्वेस्टिंग, कचरा निर्मूलन, वृक्षारोपण, पर्यावरण असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास करीत मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, उत्खनन करीत पोखरणारे डोंगर तसेच भूगर्भातील उपसा होणारा पाणी आदी बाबी पाहता संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याकरिता प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. एकंदरीत पुण्यात पावसाने केलेला हाहाकाराने देहूकर धास्तावले आहेत.