न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषदेकडून रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई
महाळुंगे इंगळे, दि. 10 (वार्ताहर) -चाकण शहरातील सिटी सर्व्हे नंबर 272 लगतच्या नैसर्गिक ओढ्यावर केलेले बहुचर्चित अतिक्रमण चाकण नगर परिषदेच्या वतीने मंगळवारी (दि. 10) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रात्रभर ही कारवाई सुरु राहणार असल्याचे चाकण नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयात चाकणचे माजी उपसरपंच व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुशंगाने चाकण शहरातील नैसर्गिक ओढ्यावर केलेले अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेश चाकण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. मागील काही दिवसांपासून या कारवाईला वेगवेगळ्या कारणांनी स्थगिती मिळाली होती. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सकाळी कारवाईसाठी गेलेल्या प्रशासनाला न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण तीन मजली इमारतीतील साहित्य काढून घेण्यास सायंकाळी सहापर्यंतचा वेळ देण्यात आला.
दरम्यान, अतिक्रमणधारक रवींद्र देशमुख यांना नोटीस देण्यात आली. पंचनामा करण्यात आला. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता ही मोठी कारवाई सुरू करण्यात आली. चाकण पालिकेच्या मुख्याधिकारी नीलम पाटील व चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते.
ज्या ओढ्यावरील अतिक्रमण काढण्याच्या बाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली व न्यायालयाने अतिक्रमण काढण्याच्या बाबत संबंधित प्रशासनाला आदेश आहेत, त्या ओढ्यावर सिटीसर्व्हे नंबर 272 लगतच्या सुमारे तीन एकर जागेत मागील अनेक वर्षांपासून काही व्यावसायिक दुकाने चालवून उदरनिर्वाह करीत आहेत. या ओढ्याला समांतर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्याला खेटून अनेकांची दुकाने आहेत. या अतिक्रमण कारवाईमुळे ओढ्या लगतच्या अन्य व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहेत.