आदित्य ठाकरेंकडून सभांजीनगरच्या मुद्याला बगल
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस औरंगाबादेत मुक्कामी आहेत. शहरातील विविध चौकात फलकांवर औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे या मागणीचा जोर वाढावा अशी रचना मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याच वेळी या प्रश्नावर शिवसेनेने मात्र मौन पाळले असल्याचे दिसून आले. औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टयातील ऑरिक सिटी हॉलची पाहणी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी गुरुवारी केली. तसेच महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांनी त्यांना संभाजीनगरच्या मुद्दयावरुन छेडले असता राजकारणावर मी नंतर बोलेन. सध्या काम करण्याकडे कल आहे, असे सांगत प्रश्न टोलवला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचे संभाजीनगर हा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. अन्य एका बैठकीत याबाबत विचारले असता, आता फक्त विकासावर बोलणार. निवडणुका आल्या की राजकीय बघू म्हणून आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले, ऑरिक सिटीत अनेक उद्योग येऊ पाहात आहेत. हे काम अजून पुढे वाढतच जाईल. स्थानिकांना रोजगार मिळेल. राज्याच्या महसूलात वाढ होईल. सायकल ट्रॅक पाहून आनंद झाला. पोलिस हौसिंग, सार्वजनिक स्वच्छतागृहावर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या असून त्यांच्या प्रकल्प नियोजनात या बाबी आहेत. येत्या महिनाभरात कारभारात फरक दिसेल, असेही बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले.
मनसेकडून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर औरंगाबाद येथील महापालिका निवडणुकीमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे ही मागणी उचलून धरली जाईल, असे अलीकडेच मनसेमध्ये पुन्हा प्रवेश घेतलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले होते. या दौऱ्याची तयारी करण्यासाठी आलेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही ही मागणी विधिमंडळात करू असे सांगितले होते.