मुंबई: देशात सध्या करोनाची तिसरी लाट सुरु आहे. रोज तीन लाखांहून अधिक करोनाबाधितांची देशात नोंद होत आहे. दरम्यान, या सर्वात करोनाची तिसरी लाट कधी ओसरणार आणि दिलासा कधी मिळणार असे प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. याबद्दल आयआयटी मद्रासकडून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातून महत्त्वाची माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.
करोनाची तिसरी लाट पुढील दोन आठवड्यांत सर्वाधिक उंची गाठेल. करोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा दर म्हणजेच आर व्हॅल्यू १४ ते २१ जानेवारीदरम्यान १.५७ होता. म्हणजेच दोन व्यक्तींच्या माध्यमातून तीन जणांना करोनाची लागण होऊ शकते. हा दर येत्या काही दिवसांत आणखी खाली जाईल, असे आयआयटी मद्रासच्या अहवालाट सांगण्यात आले आहे.
एक करोना पॉझिटिव्ह व्यक्ती किती जणांना करोना बाधित करू शकते, त्या दराला आर व्हॅल्यू म्हटले जाते. हा दर १ च्या खाली गेल्यास महामारीची स्थिती संपल्याचे समजतात.
आयआयटी मद्रासच्या अहवालानुसार, १४ ते २१ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू १.५७ होती. ७ ते १३ जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू २.२ आणि त्याआधी १ ते ६ जानेवारी दरम्यान २.९ होती. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांत करोना प्रादुर्भावाचा दर कमी होताना दिसत आहे. पुढील १४ दिवसांत तिसरी लाट ओसरेल असा अंदाज आयआयटी मद्रासकडून व्यक्त करण्यात आला आहे.
आयआयटी मद्रासच्या आकडेवारीतून मुंबई, कोलकात्याची स्थिती चांगली असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील आर व्हॅल्यू ०.६७, कोलकात्याची आर व्हॅल्यू ०.५६ आहे. त्यामुळे या शहरातील करोनाची लाट ओसरल्याचे समजते. दिल्ली, चेन्नईची आर व्हॅल्यू अद्यापही १ च्या जवळ आहे.