सुविधांबाबतही परवड
– मिलन म्हेत्रे
पुणे – पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बुधवार पेठ येथील पासोड्या विठ्ठल मंदिरात रविवारी (दि. 14) दानपेट्या फोडल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. फरासखाना पोलीस स्टेशन आणि दगडूशेठ गणपती मंदिरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या ऐतिहासिक मंदिरात ही चोरी झाली आहे. लॉकडाऊनमुळे मंदिरात अधिक ऐवज मिळाला नाही, ही गोष्ट खरी आहे; पण एकूणच या मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच या भागात चर्चेचा विषय आहे.
आषाढी वारीच्या वेळी या ठिकाणाहून ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या जातात, त्यावेळी केवळ या मंदिराचे अस्तित्व जाणवते. बाकी वेळी रस्त्याच्या मध्येच असलेल्या मंदिराबाबत ऐतिहासिक मंदिर एवढीच ओळख राहिलेली आहे. तुकाराम महाराजांच्या काळाच्या आधीपासून म्हणजे सुमारे 16 व्या शतकाच्या आधीपासून ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे मंदिर सुरक्षेसह अनेक बाबतीत दुर्लक्षित असेच आहे.
मंदिरात आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, काकडआरती, अन्नकोट हे कार्यक्रम होतात. तुकाराम बिजेच्या निमित्ताने गाथा पारायणाचा 10 दिवसांचा आणि दरवर्षी 20 ऑगस्टला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होतो. यापलीकडे येथे नित्यपूजेशिवाय कोणतेही कार्यक्रम होत नाहीत.
पथदिव्यांचा अभाव
सध्या हा परिसर कंटेन्मेन्ट झोनमुळे लॉकडाऊन आहे. मात्र, तरी पोलिसांचा वावर या भागात आहे. मात्र, आताच नाही तर इतरवेळीही या परिसरात पथदिव्यांचा कायमच अभाव असलेला दिसून आलेला आहे.
सीसीटीव्ही नाहीत. मंदिराच्या सुरक्षिततेसाठी या परिसरात सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे. मात्र, असे कॅमेरे मंदिरात बसवलेले नाहीत.
मंदिरातील पूर्वीच्या प्रथा
गेल्या काही वर्षांत मंदिरातील अनेक प्रथांमध्ये खंड पडला आहे. मंदिरात अखंड वीणेची परंपरा होती, त्या निमित्ताने मंदिराची सुरक्षितताही सांभाळली जात होती. मात्र, वीणा परंपरा अनेक वर्षांपासून बंद आहेत. मंदिरात रोज संध्याकाळी भजन-कीर्तन होत असे, तेही आता होत नाही. या ठिकाणी माउली-तुकोबांच्या पालख्या आल्यानंतर दोन्ही पालख्यांची आरती केली जाते, ती प्रथा आजही सुरू आहे.
मंदिराचा इतिहास
पासोड्या विठ्ठल मंदिर शिवकालीन असून, हरिहरेश्वराच्या दर्शनाचा लाभ मंदिरात घेता येतो. या ठिकाणी विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींबरोबरच स्वयंभू शिवलिंग आहे. या शिवलिंगावरचा शाळुंका आता पक्का बसविण्यात आला आहे. त्याच्या खाली मूळ पाच पिंडींचे स्थान असल्याचे येथील स्थानिक ज्येष्ठ नागरिक सांगतात. 1927 साली मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. 20 ऑगस्ट 1943 रोजी पहाटे नवीन विठ्ठलमूर्तींची प्राणप्रतिष्ठा सदाशिव मोने यांच्या हस्ते करण्यात आल्याचा उल्लेख मंदिरात आढळतो. याबरोबर गणपती, पार्वती, ज्ञानेश्वरमाऊली, नामदेवमहाराज आणि मारुतीच्या मूर्तीही मंदिरात आहेत. देवळासमोर मोठा हौद असून त्यात पूर्वी कारंजे होते. या ठिकाणी तुकाराम महाराजांची कीर्तने मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.
परिसरात बहुतेक वेळा अंधार
या भागातील पथदिवे हे बरेचवेळा बंद असतात, त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन अशा चोऱ्या अनेकवेळा झाल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात पथदिवे सुरू असणे गरजेचे आहे.
पुन्हा अशा प्रकारची घटना मंदिरात घडू नये यासाठी मंदिराच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या, लॉकडाऊन आहे, ते मागे घेतल्यावर लगेचच येथे सीसीटीव्ही बसवण्याची तजवीज केली जाईल, त्याचबरोबर मंदिराच्या इतरही सुरक्षिततेची योजना करण्यात येणार आहे.
– संजय गांधी, विश्वस्त, पासोड्या विठ्ठल मंदिर, पुणे