पणजी – बहुप्रतीक्षित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा आज पणजीत प्रारंभ झाला. इफ्फीचे हे 51 वे वर्ष असून, चित्रपटांच्या मनोरंजनाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाची सुरुवात, चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या उपस्थितीत मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. गोव्यातील पणजी इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर आज जगभरातील चित्रपट कलावंत, निर्माते आणि चोखंदळ रसिकांच्या मांदियाळीत या महोत्सवाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते सुदीप उपस्थित होते. भारतीय पॅनोरामाच्या ज्युरीचे अध्यक्ष प्रियदर्शन नायर आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. “भारत ही एक अत्यंत विलोभनीय, आश्चर्यकारक भूमी असून इथे आपण कोणतीही स्वप्ने बघू शकतो, कारण भारतात काहीही शक्य आहे.अशी प्रतीक्रिया,आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांनी व्हिडीओ संदेशातून व्यक्त केली.
भारतातील 190 चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येतील. 2020 मध्ये आलेल्या आजारावर आपण 2021 मध्ये लस निर्माण केली आहे हे आपल्या लढाऊ वृत्तीचे द्योतक आहे, अशी भावना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केली. इफ्फी कार्यक्रमाला केवळ भारत सरकार आणि गोवा सरकार यांच्यापुरते मर्यादित न ठेवता पुढच्या वर्षीच्या 52 व्या इफ्फी मध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग असेल अशी घोषणा जावडेकर यांनी यावेळी केली.
केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सिनेमानिर्मितीचा उत्सव साजरा करणारे अत्यंत सशक्त व्यासपीठ आहे. 51 वा इफ्फी पहिल्यांदाच मिश्र स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष आणी आभासी स्वरूपात होत आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन प्रसारणासाठी इफ्फीचा स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे. पहिल्यांदाच हा महोत्सव ऑनलाईन होत असल्याने जगभरातील सिनेरसिक प्रतिनिधी या महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली.
बांगलादेशातील निवडक दर्जेदार 10 चित्रपट
यंदाच्या इफ्फीमध्ये बांगलादेशची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. या महोत्सवात, बांगलादेशातील निवडक दर्जेदार दहा चित्रपट दाखवले जाणार आहेत. अशा आव्हानात्मक काळातही इफ्फीचे आयोजन करण्याचा सरकारचा निर्णय, भारताची आव्हाने पार करण्याची धाडसी वृत्ती आणि कटीबद्धता दर्शवणारा तसेच कला आणि संस्कृतीविषयी असलेली आत्मीयता प्रकट करणारा आहे, अशा भावना बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रान यांनी यावेळी व्यक्त केल्या.