नवी दिल्ली – लॉकडाउनच्या काळात अनेक स्थलांतरीत ट्रक, ट्रॉली, रेल्वे, बस अथवा चालत स्वगृही परतत आहेत. यामध्ये उत्तरप्रदेशमधील मजुरांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. यासंर्भातील वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
वृत्तानुसार, कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल. आमच्या परवानगीशिवाय त्यांना राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती योगींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली.
परराज्यांमधून स्वत:च्या राज्यात आलेल्या कामगारांची नोंदणी करण्यात आली असून हे मजूर काय काम करतात याचीही माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी ही नोंदणी करताना गोळा केली असल्याचे योगी यांनी यावेळी सांगितले.
तसेच स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात काम करण्यासाठी एका आयोगाची स्थापना करावी अशी मागणीही योगींनी केली आहे. या आयोगाच्या माध्यमातून स्थलांतरितांच्या प्रश्नांवर काम करुन त्यांचे शोषण केले जाणार नाही यासंदर्भात काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा योगींनी व्यक्त केली.