मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा म्हटले आहे की, मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचा आमचा निर्धार कायम आहे.
तसेच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. याच मुद्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच मुद्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
नाशिक येथे माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे यांना काही अटी घालून देत परवानगी देण्यात आली होती. मात्र या सभेत अटींचं उल्लंघन झाल्याचं मला कळल आहे. यावर पोलीस त्यांच काम करत आहेत.मात्र कोणीच कायद्याचं उल्लंघन करू नये, आणि भर सभेत कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम देऊ नये.’ असं म्हणत त्यांनीराज ठाकरेंना टोला लगावला.
ते पुढे म्हणाले, ‘इथे हुकुमशाही नाही, काय अल्टिमेटम द्यायचे असतील तर ते तुमच्या घरात द्या, बाकी कोर्टाचे आदेश सर्वांसाठी सारखे आहेत, मग तो सर्वसामान्य नागरिक असेल किंवा अजित पवार, सर्वांना कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे.’ असेही पवार राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम वर म्हणाले आहे.