मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षांकडून सातत्याने औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा रेटण्यात येत आहे. त्यावर विविध पक्षातील नेत्यांकडून भूमिका स्पष्ट करण्यात येत आहेत. त्यातच आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आपले मत मांडले आहे.
अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीने नामांतर करणे योग्य नाही. नामांतर करायचेच असेल, तर आधी महाराष्ट्राचे नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या, अशी मागणी आझमी यांनी केली. तसेच रायगडचे नाव बदलून संभाजी महाराजांचे नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणे योग्य नाही,” असे आवाहन आझमी यांनी केले. केवळ शहरांची नावे बदलून कुणाचे पोट भरत नाही. शहरांना आवडीचे नाव द्यायचे असेल, तर नवी शहरे वसवून ठेवा, असा सल्लाही आझमी यांनी व्हिडीओद्वारे दिला.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्यावरून सध्या राजकीय वाद पेटला आहे. भाजप नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर औरंगाबाद महापालिकेत सत्ता दिल्यास पहिल्याच दिवशी प्रस्तावर सादर करण्याचे आश्वासन दिले. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी ऐतिहासिक दाखले देखील दिले होते.
दरम्यान केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता असताना नामांतर का केले नाही, असा प्रश्न विचारला असता, आमच्या वेळेस झाले नाही, म्हणून आताही ते होऊ नये, असं नाही, असे म्हणत पाटील यांनी वेळ मारून नेली. तर नामांतर हा विषय सध्या आमच्या अजेंड्यावर नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.