नवी दिल्ली – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. अशातच राष्ट्रीय पक्ष हुकूमशाही करणार असेल तर तो मित्रपक्ष म्हणून आम्हाला नको, अशा कडक शब्दात अण्णाद्रमुकने भाजपला इशारा दिला आहे.
भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी पलनिस्वामी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील का, या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळले. या पार्श्वभूमीवर अण्णा द्रमुकचे निवडणुकीचे समन्वयक खासदार केपी मुनुस्वामी यांनी मुख्यमंत्री ई पलनिस्वामी हेच विधानसभा निवडणुकीत पक्षाचा चेहरा असतील. आमची भूमिका पटत नसेल तर मैत्रीबाबत फेरविचार करा, अशा शब्दांत स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती करण्याचे सूतोवाच अण्णाद्रमुकने याआधीच केले आहे. परंतु, रजनीकांत यांच्या पक्षामुळे तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी रजनीकांत यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अण्णाद्रमुक आणि भाजप युती कायम राहणार का, असा प्रश्नही पुढे आला आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकच्या वक्तव्यास महत्व वाढले आहे.