नवी दिल्ली : देशात करोनासोबतच आणखी एक प्रकरण चांगलेच चर्चेला येत आहे. केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर असा वाद विकोपाला जात असल्याचे दिसत आहे. याच प्रकरणावरून आता विरोधकांनी पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
देशात सध्या लसींच्या तुटवड्याची समस्या उभी राहिली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत ऑक्सिजन तुटवड्याची समस्या होती. त्याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड या समस्या देखील समोर येत आहेत. यावर सातत्याने राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात करोना लसींचा तुटवडा असताना केंद्र सरकार मात्र ट्विटरच्या मागे लागले असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे.
ब्लू टिक के लिए मोदी सरकार लड़ रही है-
कोविड टीका चाहिए तो आत्मनिर्भर बनो!#Priorities— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 6, 2021
“ब्लूट टिकसाठी मोदी सरकार भांडत आहे, कोविडची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा”, असं सूचक आणि खोचक ट्वीट राहुल गांधींनी केले आहे. तसेच, या ट्वीटसोबत #Priorities देखील लिहिले आहे.
केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरील सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांसाठी नवी नियमावली जारी केली. या नियमावलीनुसार सोशल मीडियावर व्हायरल होणारे संदेश पहिल्यांदा पोस्ट करणाऱ्याची माहिती देणे, भारतात नोडल अधिकारी, तक्रार निवारण अधिकारी यांची नेमणूक करणे अशा अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. २६ मे पासून देशभरात ही नियमावली लागू झाली असून ट्विटरकडून अजूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.