पुणे- फळांचा राजा आंबा…त्यातही तो हापूस आंबा म्हटल्यावर आपण त्यावर तुटून पडतो. बऱ्याचदा रस्त्याकडेला पथारीधारकांकडे किंवा टेम्पोतून विक्रीसाठी आणलेला आंबा स्वस्त वाटत असला, तरी तो विकत घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी बऱ्याचदा आंबा चटकन पिकवण्यासाठी वेगवेगळी रसायने वापरली जातात. ती आपल्याला अपायकारक ठरू शकतात.
असा ओळखा रसायनयुक्त आंबा
रसायनात पिकलेला आंबा वरून पिवळाधमक दिसतो. आतून अर्धा कच्चाच असतो. त्यातील गर पिकत नाही. रसायनातून निघणाऱ्या विशिष्ट वायू आणि उष्णतेमुळे आंब्याचा फक्त रंग बदलतो. अनेकदा उग्र वास येतो. असे आंबे खरेदी करू नयेत. अशा आंब्याचे सेवन केल्यास अपचन, ऍसिडिटी असे आजार होण्याची शक्यता असते.
प्रशासनाची जबाबदारी
ग्राहकांना उत्तम दर्जाचा आंबा मिळावा, यासाठी कोणतंही रसायन न टाकता पिकवलेला आंबा मिळणे आवश्यक आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी अशा रस्त्यालगतच्या आंबा व्यापाऱ्यांची चौकशी करणं आवश्यक आहे.
आंबा वरून पिवळा नसला, तरी चालेल
आंबा पिवळाधमक दिसावा, असा आपला समज आहे. तो आधी मनातून काढून राकावा. थोडासा हिरवट असलेला पण झाडावरच पिकलेला, पण आतून केशरी असणारा आंबा उत्तम दर्जाचा असतो. त्यामुळे ग्राहकांनी काळजी घेऊनच आंबा खरेदी करावा.
फळांमध्ये भेसळ
आपल्याकडे सध्या मिळणाऱ्या रत्नागिरी, देवगड हापूसमध्ये काही किरकोळ व्यापारी केरळ, कर्नाटक आणि विशेषत: चेन्नईचा आंबा मिसळतात. तो दिसायला आपल्या हापूससारखा असला, तरी ती मधूरता आणि गोडवा त्या फळात नसतो. कमी दर्जाची 2-3 फळं डझनाच्या पेटीत सहज मिसळतात.
आंबा हा फळांचा राजा आहे. तो वर्षभरातून एकदाच आपल्या भेटीला येतो. त्यामुळे तो दिसायला सुंदर आणि चवीला दर्जेदार असावा. त्यामुळे ओळखीच्या आणि भरवशाच्या व्यापाऱ्याकडूनच आंबा घ्या. गरज असल्यास तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. स्वस्तात मिळतो, म्हणून कोणताही आंबा खाऊ नका.
– युवराज काची, आंब्याचे व्यापारी, मार्केटयार्ड
वाढत्या तापमानाचा जबर परिणाम
सध्या राज्यात सर्वत्र 40 अंश सेल्सियसजवळ तापमान गेले आहे. त्यामुळे आंब्याच्या फळाला झाडावर असतानाच चटका बसतो आहे. त्यामुळे फळाचे नुकसान होते आहे. त्यामुळे काही उत्पादक वेळेपूर्वी फळाची काढणी करतात. ते फळ बाजारात येण्यापूर्वी त्यावर रसायन टाकले जाते. त्यामुळे अर्धकच्च्या फळाचाही रंग बदलतो. काही वेळा हे फळ पारंपरिक नैसर्गिक पद्धतीने पिकवले जाते. अशा आंब्याला सध्या 1000 ते 1500 रुपये डझन भाव मिळत आहे.
झटपट आंबा पिकवण्याची “कला’
नैसर्गिक किंवा पारंपरिक पद्धतीने आंबा पिकवण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात, तर रसायनाचा वापर करून अवघ्या काही तासांत अर्धा कच्चा आंबा तयार होतो. दिसायलाही तो पिवळाधमक असतो. ग्राहकांनाही तो आकर्षित करतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवण्याऐवजी झटपट पिकवण्यासाठी विक्रेते कॅल्शियम कार्बाइड किंवा अन्य रसायनांचा वापर करत आहेत. काही ठिकाणी त्याचे भाव 400 ते 500 रुपये डझन आहेत.