वाढती स्पर्धा आणि बदलती जीवनशैली यामुळे सध्या आरोग्याशी निगडित समस्या वाढल्या आहेत. पायदुखी ही तशी साधी तक्रार पण त्यामुळे हैराण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कधी सततचे उभे राहून काम, कधी खुर्चीत बसल्याने पायाला लागणारी रग तर कधी अनिमिया आणि हाडांशी संबंधित तक्रारी यांमुळे पाय दुखण्याची तक्रार सर्वच वयोगटात दिसून येते.
यामागे आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, चुकीची पादत्राणे, जीवनशैलीतील बदल अशी अनेक कारणे सांगता येतात. पण दुखणाऱ्या पायांवर वेळीच उपाय न केल्यास ही समस्या वाढत जाते. मग दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा परिणाम दिसू लागतो. तेव्हा या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी वेळीच उपाययोजना केलेल्या बऱ्या. पाहूयात पायदुखी कमी होण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय…
- बराच काळ खुर्चीत बसून काम केल्याने कालांतराने पाय दुखायला लागतात. अशावेळी बसलेल्या जागीच पाय सरळ करून स्ट्रेच करावेत यामुळे थकवा दूर होतो आणि काही वेळाकरता आराम मिळतो.
- आपण दररोज वापरत असलेली चप्पल, बूट, सॅंडल यांचाही पायावर परिणाम होत असतो. ही पादत्राणे योग्य नसतील तर त्यामुळेही पायदुखीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पादत्राणे खरेदी करताना आपल्या सोयीनुसार चांगल्या दर्जाची पादत्राणे घ्यावीत.
- अनेकदा थंडी असलेल्या ठिकाणी गारठ्यामुळेही पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो. तसेच घरातील फरशी टणक असल्याने सतत या फरशीवर उभे राहिल्यास विशेषत: महिलांच्या टाचा आणि पावले दुखू शकतात. अशावेळी घरातही स्लिपरचा नियमित वापर करावा.
- सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पायाचे काही किमान व्यायाम केल्यास पायदुखीची समस्या निश्चित कमी होऊ शकते. या व्यायामांमुळे पायातील ताणलेल्या शिरा मोकळ्या होण्यास मदत होते.
- शरीराचा रक्तप्रवाह सतत खालच्या दिशेने होत असतो, त्यामुळे मुद्दाम झोपताना किंवा बसताना पाय उशीवर थोडे वरच्या दिशेने ठेवल्यास त्याचाही पायदुखी कमी होण्यास फायदा होऊ शकतो.
- शक्य तेव्हा पायांना तेलाने मालिश करणे हा पायदुखी कमी होण्यासाठीचा आणखी एक उपाय आहे. यामध्ये पायाचे तळवे, टाचा, बोटे, पोटऱ्या, गुडघे यांना मालिश करावे. त्यामुळे शिरा मोकळ्या होऊन आराम मिळू शकतो.
- पाय जास्तच दुखत असतील तर गरम पाण्यात घालून 20 ते 25 मिनिटे बसावे. या पाण्यात मीठ टाकल्यास आणखी चांगले. यामुळे दुखणारे पाय मोकळे होण्यास मदत होते.
- लठ्ठपणा हेही पाय दुखण्याचे आणखी एक कारण असते. त्यामुळे ज्यांचे पाय दीर्घकाळ दुखतात त्यांनी वजन कमी करण्यावर भर द्यावा. लठ्ठ व्यक्तींचे वजन त्यांच्या गुडघ्यांवर येते, त्यामुळे त्यांचे गुडघेही दुखतात. अशांनी वजन नियंत्रणात राहील याची काळजी घ्यावी.
- आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे व शरीरासाठी आवश्यक असणारे इतर घटक योग्य प्रमाणात नसतील तरीही पायदुखीसारखी समस्या भेडसावू शकते. त्यामुळे योग्य तो संतुलित आहार घेण्यावर भर ठेवा.