नवी दिल्ली : देशातील करोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. त्यासाठी देशात करोना लसीकरण सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत करोनाची लस घेतली आहे. करोनातून बरं झालेल्यांसाठी लसीचा एक डोसही पुरेसा असल्याचा दावा आता शास्त्रज्ञांनी केला आहे.
करोना होऊन गेलेल्या लोकांच्या शरीरात लसीचा पहिला डोस 10 दिवसांच्या आत अँटीबॉडी तयार करतो. या अँटीबॉडी करोनाविरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरतात अशी माहिती आता संशोधनातून समोर आली आहे.एका हिंदी संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बीएचयू झुलॉजी डिपार्टमेंट, आयएमएसबीएचयू विभागाच्या या संशोधनानंतर शास्त्रज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून करोनातून बरे झालेल्यांसाठी लसीचा एक डोसच देण्याबाबतचा सल्ला दिला आहे.
बीएचयूचे झुलॉजी विभागाचे प्रोफेसर ज्ञानेश्वर चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस लोकांवर एक संशोधन करण्यात आलं आहे. हे संशोधन कोरोनासाठी कारणीभूत असलेल्या व्हायरसविरोधात नैसर्गिक अँटीबॉडीचा रोल आणि त्याच्या फायद्याची माहिती देते.
करोना लसीचा पहिला डोस अशा लोकांमध्ये अगदी जलदगतीने अँटीबॉडी तयार करतो, ज्यांना याआधीच करोनाची लागण झाली आहे. तर, ज्यांना करोना झालेला नाही, अशा लोकांमध्ये लस घेतल्यानंतर तीन ते चार आठवड्यांनी अँटीबॉडी विकसित होतात.