गेल्या काही दिवसांत रानगवा पुण्याच्या मानवी वस्तीत शिरल्याचे लागोपाठ दोन प्रकार घडले. पहिल्या घटनेत तो गवा मृत्युमुखी पडला तर दुसरा गवा वनविभागात जाण्यात यशस्वी झाला. मुंबईमध्येही कांदीवली-बोरीवली-मालाड सारख्या भागात बिबट्याचे आक्रमण होत असते. जुन्नर, खेड, राजगुरुनगर तर बिबट्यांच्या हल्ल्यांसाठी कुप्रसिद्धच आहे. तिकडे कोयना अभयारण्य-कोल्हापूर येथेही असे प्रकार घडतच असतात. मॅन व्हर्सेस वाईल्ड अर्थात मानव आणि वन्यजीव संघर्षाची ही वाढती उदाहरणे काय दर्शवतात, याचा उहापोह करणारी ही कहाणी…
स्थळ : पुणे : वर्ष : साधारण 2018
यवतमाळच्या जंगलात एक नरभक्षक वाघिणीला गोळ्या झाडून ठार मारल्याच्या बातम्यांनी त्यावेळी बरीच चर्चा घडविली होती. खरं तर पर्यावरण बातमीदार असूनही, त्यावेळी मी सर्वसामान्य लोकांप्रमाणे “आपल्याला काय करायचंय?’ असा विचार करून त्या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्यानंतर अगदी काही महिनेच उलटल्यावर “पुण्यात केशवनगरमध्ये बिबट्या आला असून, त्याने पाच लोकांवर हल्ला’ केल्याची बातमी समजली. त्या दिवशी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची सुरू असलेली कसरत, नागरिकांमध्ये असलेली दहशत, माध्यमांची लगबग हा सगळा प्रकार जवळून अनुभवता आला, कारण ही घटना अगदी आपल्या घरातच घडत असल्याची भावना होती.
त्या घटनेनंतर मात्र एखाद्या शहरात वन्यप्राणी घुसल्याची घटना किती गंभीर असते ते कळाले. कारण त्यात त्या प्राण्यांचा आणि मनुष्याचा जीव पणाला लागलेला असतो. मग हे प्राणी जंगल सोडून का बरं शहरात येतात? असा प्रश्न पडू लागला. त्यातूनच या प्रश्नांचे उत्तर शोधण्याची उर्मी निर्माण झाली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने माझी पर्यावरण/वन्यजीव विषयक बातमीदारीला सुरवात झाली. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी शहरातील एनडीए परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची बातमी कळाली. त्यावेळी मी पुणे वनविभागाच्या उपवनसंरक्षक असलेल्या ए. श्रीलक्ष्मी यांना भेटले.
लक्ष्मी यांनी मला वनविभाग करत असलेल्या उपाय योजनाबद्दल माहिती दिली. पण मूळ प्रश्न अजूनही तसाच होता, “का येतात हे प्राणी शहरात?’ पुढे गप्पांच्या ओघात मिळालेलं त्यांचं उत्तर खरोखरच डोळ्यात अंजन घालणारं होतं. त्या म्हणाल्या, “प्राणी तुमच्या घरात येत नाहीत; तर आपणच त्यांच्या घरांवर आक्रमण करत आहोत. विकासकामांच्या नावावर जंगल, माळरान, गायरान, कुरण हे सगळ आपण नष्ट करत आहोत. जलस्रोत बुजवले जाताहेत, टेकड्या फोडल्या जाताहेत, मग त्यांनी रहायचं कुठे? त्यांची परिसंस्थाच आपण नष्ट करत आहोत; मग त्यांनी खायचं काय? अन्न आणि निवारा ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे आणि हक्कही, आपण जर त्यांचा हक्क हिरावत असू, तर ते त्याच्या शोधात आपल्याकडे येणारच ना?’
त्याचं उत्तर ऐकल्यानंतर पुढे काय बोलायचे हे समजतच नव्हते. त्यांच्याशी बोलल्यानंतर मी पुन्हा माझ्या ऑफिसमधे येण्यासाठी निघाले. सेनापती बापट रस्ता ते नारायण पेठ हा साधारण 10-15 मिनिटांचा रस्ता, नेहमीचा; पण त्या दिवशी वाहनापेक्षा विचारांचा वेग जास्त होता. त्यादिवशी, अनेकांकडून कधी न कधी ऐकलेल्या गोष्टींचा फ्लॅशबॅक सुरू होता.
आजचा डेक्कन आणि त्यालगतचा परिसर असा नव्हताच. पूर्वी संध्याकाळच्या वेळी नदी पार करायला लोकं घाबरायचे, इतकं घनदाट जंगल होतं तिथे. सिंहगड रस्त्यावर कितीतरी झाडे होती. कोणे एकेकाळी आजची मंडई, स्वारगेट हे गावाबाहेरचे भाग होते. जंगल, माळरान होतं सगळं. अशा अनेक गोष्टी ऐकल्याचे आठवत होते, आणि त्यातूनच आजचं बदलेल पुणं, विकास आणि एकूणच झालेला बदल काहीसा वेगळा, विचार करण्यास भाग पाडणारा वाटू लागला. विकासाकडे झेपावताना आपण कोणाचे तरी घर हिरावतो आहे का? असा प्रश्नही त्यावेळी मनात उमटला. या शोध प्रवासात अजून बऱ्याच गोष्टींची उकल व्हायची बाकी होती.
वडाची केशवनगर मधील घटनेनंतर पुढे पुणे जिल्ह्यात विशेषत: जुन्नर, शिरूर, इंदापूर अशा विविध भागांमध्ये अधूनमधून बातम्या येतच होत्या. कधी विहरीत अडकलेला, तर कधी उसाच्या शेतात लपलेला, कधी गावांमधील कुत्री, शेळ्या, कोंबड्या यासारख्या प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या बातम्यांमधून समोर येत होता. तर मध्येच वाघ, हत्ती अशा अन्य काही प्राण्यांबरोबर संघर्षाची घटनाही घडत होत्या. त्यानिमित्ताने शोध घेतानाच वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांनी बिबट्यांबाबत बराच अभ्यास केला असून, बिबट्यांसाठीचा व्यवस्थापन आराखडा त्यांनी राज्य सरकारकडे सादर केला असल्याची माहिती मिळाली. मग काय अत्रेय यांच्याशी संपर्क साधत, परिस्थितीबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अत्रेय यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती पाठवली. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील वाढत्या बिबट संख्येबाबत त्यांचे निरीक्षणही नोंदविले.
अत्रेय यांच्या मते, जुन्नर, शिरूर, इंदापूर, बारामती या भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या शेतीमध्ये बिबट्या आपला अधिवास प्रस्थापित करत असून, परिस्थितीशी जूळवून घेत, त्याने नवीन जीवनशैली आत्मसात केली आहे. त्यातच मुबलक प्रमाणात पाणी आणि आसपासच्या गावांमध्ये असलेले पाळीव, भटके प्राणी हे त्याचे “इझी फुड’ अर्थात प्रमुख भक्ष बनत आहेत.
त्यातच बिबट्यांची संख्या वाढत असल्याने, ते आसपासच्या परिसरात आपला विस्तार वाढवत आहेत. त्यातूनच वन्यप्राणी- मानव संघर्ष निर्माण होत असून, यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.
दरम्यानच्या काळात जुन्नर येथे विहरीत अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या टीमने सुखरूपणे विहरीतून बाहेर काढले आणि त्याला देखरेखीसाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले. बिबट्यांचा केंद्रस्थान असलेल्या जुन्नर येथे बिबट्यांच्या संदर्भात नेमके काय केले जाते? याबाबतच्या उत्सुकतेतून त्या ठिकाणचे वनविभागाचे अधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून माणिकडोह येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांच्याशी संपर्क झाला. या केंद्रात बिबट्यांसाठी असलेली निवाऱ्याची व्यवस्था, त्यांच्या देखभाल आणि उपचरासाठी केले जाणारे प्रयत्न, परिसरात जनजागृतीसाठी वनविभाग आणि इतर स्वयंसेवी संस्था यांच्याकडून सुरू असणारे उपक्रम अशा अनेक विषयांवर त्यांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली. सोबतच वन्यप्राणी हे देखील आपल्या पर्यावरणाचा भाग असून, त्यांच्यासोबत सहजीवनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
हे सगळे सुरु असतानाच, पुणे शहरात अजून दोन घटना घडल्या, ज्याने या विषयाला एक वेगळी खोली निर्माण केली. ती म्हणजे शहरात दोनदा झालेले गव्याचे आगमन आणि त्यातील एकाचा दुदैर्वी मृत्यु तर दुसऱ्याची सुखरूप सुटका. या दोन्ही घटनांनी वन्यजीव आणि त्यांची जीवनशैली, पर्यावरणातील बदल आणि भविष्यातील शक्यतांची अधिक ठळकपणे जाणीव करून दिली.
पुण्यात 9 डिसेंबर 2020 रोजी पहिल्या गव्याचे दर्शन झाले. त्यावेळी झालेली लोकांची गर्दी, त्यातून भेदरलेला गवा आणि त्या गव्याचा झालेला दुर्दैवी मृत्यु हा एक सुन्न करणारा अनुभव होता. तर त्याचवेळी दुसऱ्यांदा गवा दिसल्यानंतर त्याला सुखरूपणे त्याच्या अधिवासात परतविण्यासाठी झालेले काळजीपूर्वक प्रयत्न, या दोन्ही घटनांमध्ये वनविभाग आणि वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवींची भूमिका महत्वाची ठरली.
भविष्यातील अशा घटनांसाठी वनविभाग आता अधिक सज्ज होत आहे. एकूणच काय तर भविष्यात मानवी वस्तीजवळ वन्यप्राणी येतच राहणार. त्यांच्याबाबत भीती बाळगण्यापेक्षा सावधता बाळगणे अधिक गरजेचे आहे. कारण मानव- वन्यप्राणी हा संघर्ष जिंकण्याचा नाही, तर जगण्याचा आहे. सहजीवनाचा स्वीकार हाच याचा कायमस्वरूपी उपाय असून, येणाऱ्या काळात कुतुहल, भितीपोटी एखादा प्राण्याला इजा पोहचेल अथवा तो घाबरेल असे कृत्य करण्यापेक्षा अतिशय संयमाने परिस्थिती हाताळणे महत्वाचे ठरेल.
काय म्हणतात सुनिल लिमये?
याबाबत वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये म्हणाले, मानव-वन्यजीव संघर्ष हा आता एका ठराविक प्रदेशापुरता मर्यादित राहिलेला नाही. अगदी अपेक्षित नसलेल्या ठिकाणीदेखील मानवी वस्तीमध्ये एखादा वन्यजीव आला असल्याच्या घटना पहायला मिळत आहे. त्यामुळे वन विभागालादेखील अधिक सज्ज होण्याची गरज आहे. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर विभागाने सर्वच प्रादेशिक कार्यालये, वनवृत्त यांच्याकडील उपलब्ध साहित्य आणि आवश्यक साहित्याचा आढावा घेतला असून, वन्यजीव बचाव मोहिमेसाठी लागणारी सर्वच साधने, वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. वन विभागाला स्वत:चे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात प्रत्येक वनवृत्तांमध्ये सर्व सोयी-सुविधांनी आणि आवश्यक तज्ज्ञांनी सुसज्ज अशी टीम तयार करण्याचे काम आता युद्धपातळीवर केले जाईल.