मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर महाविकासआघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. नुकतीच भाजपने पदाची ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामानाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की, पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ? याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी यावा यासाठी मोदी-शहा यांना साडेपाच वर्षे का लागावीत? हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा’ होता. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल, असा सल्ला वजा इशारा शिवसेनेने भाजपाला दिला आहे.