मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“प्रताप सरनाईक यांना आता जेल दिसायला लागलं. यांच्या सर्व मंत्र्यांना जेलजवळ दिसलं म्हणून युती पाहिजे. यानंतर आता अनिल परब आहेत. जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का? अशी माफी मिळत नाही. यांचे गुडघे पण जेलमध्येच टेकावे लागले तरी त्यांना माफी नाही,” असेही निलेश राणे म्हणाले.
दरम्यान, राणे बंधूं शिवसेनेवर नेहमीच टीका करताना दिसतात. त्यातच शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी सिंधुदुर्गात झालेल्या शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमधील वाद मिटला नसल्याचे चिन्हं आहेत. कारण कुडाळ येथे झालेल्या राड्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या सुपुत्र नितेश आणि निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देऊ असे म्हटले होते. यावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दोन्ही सुपुत्रांना खुले आव्हान दिले आहे. “हिंमत असेल तर निलेश-नितेश यांनी खुल्या मैदानात यावं, असे नाईक यांनी म्हटले.
वैभव नाईक यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी निलेश आणि नितेश राणेंवर टीका करताना खुलं आव्हान दिले. शिवसेना आणि राणे कुटुंबाचा वाद सर्वांना परिचित आहे. नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र नेहमी शिवसेनेवर टीका करत असतात. तर शिवसेनेकडूनही सातत्याने राणे पिता-पूत्रांना शह देण्याचा प्रयत्न कोकणात सुरू असतो.