नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कुठे लोकांना बेड मिळत नाहीत तर कोणाला ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकाचे हाल होताना दिसत आहे. अशीच परिस्थिती बिहारमध्येही पाहायला मिळत आहे. या सर्व परिस्थितीवर आता पाटणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने ही परिस्थिती तुम्हाला हाताळता येत नसेल तर लष्कराकडे सर्व परिस्थिती सोपवा असे म्हटले आहे.
संपूर्ण देशासह बिहारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. इथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, बऱ्याच लोकांचे जीव ऑक्सिजन आणि बेडच्या अभावामुळे होताना पाहायला मिळत आहेत. बिहारमधील कोरोना प्रकरण वाढत असताना पाटणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, “जर राज्य सरकारला राज्यातील परिस्तिथी नियंत्रणात आणता येत नसेल तर कोविडचे व्यवस्थापन आम्ही सैन्याच्या स्वाधीन करावे का?” असा सवाल न्यायालयाने केला आहे. तसेच वारंवार आदेश देऊनही राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे ही यावेळी न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.
आमच्या वारंवार आदेशानंतरही लोक मरत आहेत ही लज्जास्पद बाब आहे, असेही न्यायालायने यावेळी म्हटले आहे. दरम्यान, राज्यात सरकारी रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही आणि जे दाखल आहेत त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. दरम्यान, नितीश सरकारने 15 मे पर्यंत बिहारमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या निर्णयाची माहिती दिली.