अहमदनगर: राज्यात तेरा वर्षे जर मंत्रीपद देऊन देखील यांना काही काम करता येत नसेल तर हातात बांगड्या भरल्या पाहिजेत. याला आपल्या इथे म्हणतात, नाचता येईना अंगण वाकडे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते श्रीगोंदा येथील जाहीर सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, या ठिकाणी मुख्यमंत्री आले असता आघाडीतील माजी मंत्री व सध्याचे भाजपा नेते बबनराव पाचपुते यांनी भाषणात सांगितले की, १३ वर्षे मला मंत्रीपद दिलं, पण मला फक्त सहीचाच अधिकार होता. राज्य सरकारमध्ये वन खातं हे अत्यंत महत्त्वाचं खात असतं. हे खातंही त्यांना देण्यात आलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांचे एक भाषण वाचनात आले होते. त्यांनी सभागृहासमोर काही कागदपत्रे ठेऊन हे माजी मंत्री दरोडेखोर असल्याचा आरोप केला होता आणि आज आरोप करणारे मुख्यमंत्री झालेत आणि त्यांचं कौतुक करत आहेत. मुख्यमंत्री साहेब, अहो असं वागणं बरं नव्हं, असा चिमटा देखील पवारांनी काढला.