शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचले
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा वाद हा सध्या राजकीय वर्तुळातील एकमेव प्रश्न बनला आहे. त्यातच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची अधिकृत घोषणा भाजपने केली आहे. दरम्यान, भाजपने केलेल्या या कृतीचा शिवसेनेकडून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. कारण आज पुन्हा शिवसेनेकडून सामनामधून भाजपला धारेवर धरण्यात आले आहे. एनडीएतून आम्हाला बाहेर काढणारे तुम्ही कोण असा सवाल करत सेनेकडून भाजपला आव्हन दिले आहे.
राज्यातील सत्ता समीकरणानंतर ताणलेल्या संबंधामुळे अखेर युतीचा पोपट अधिकृतरित्या मरण पावला. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा भाजपाकडूनच करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली होती. शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे,असंही ते म्हणाले. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? असा सवाल शिवसनेकडून करण्यात आला आहे. एनडीएची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. साधी चर्चा नाही, चिठ्ठीचपाटी नाही. ज्या एनडीएचे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या एनडीएतून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली आहे.
सर्वजण मोदी यांच्या विरोधात होते. त्यावेळी शिवसेनेने त्यांचा वचाव केला होता. त्याच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघटनेला शिवसेना प्रमुखांच्या पुण्यतिथीलाच भाजपानं बाहेर काढलं. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी राजांचा आहे अशा मंबाजींना तो साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे, अशा शब्दात शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला. शिवसेनेने सामनातील अग्रलेखातून या प्रकारावर टीका केली आहे. ज्या वाकडतोंड्याने ही घोषणा केली त्याला शिवसेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्मधर्म माहीत नाही. तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या घुगऱ्या शिवसेनेने खाल्ल्या आहेत. एनडीएच्या जन्मकळा व बाळंतपणाच्या वेदना शिवसेनेने अनुभवल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या वाऱ्यालाही कुणी उभे राहायला तयार नव्हते आणि हिंदुत्व, राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात कुणी विचारीत नव्हते, तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल ओतण्याचे कार्य शिवसेनेने केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेस बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी तर इतिहास समजून घेतला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, पंजाबचे बादल अशा दिग्गजांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाया घातला तेव्हा आजचे दिल्लीश्वर गोधडीत रांगतसुद्धा नसावेत. काहींचा तर जन्मही झाला नसावा, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.