वडापुरी – इंदापूरला पाणी मिळण्याचा निर्णय रद्द केल्याचे पत्र आम्हाला द्या अन्यथा आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ असे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बबनराव शिंदे यांनी जाहीर केले आहे.अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर दबाव टाकून कोणी इंदापूरच्या हक्काचे पाणी कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर इंदापूरच्या पाणीप्रश्नासाठी मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य पदांचा राजीनामा देणार असल्याचे यानिमित्ताने सांगतो असे मत जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले यांनी व्यक्त केले.
उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न पेटला असून ठीक ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे.आज वडापुरी येथे सकाळी १० वाजता पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून सोलापूरच्या लोकप्रतिनिधींचा निषेध केला.
यावेळी बोलताना अभिजीत तांबिले म्हणाले की उजनी धरण तयार होत असताना इंदापूर तालुक्याने खूप मोठा त्याग केला अस असून त्यासाठी हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे तरी आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळत नाही. लातूर जिल्ह्याचा काहीही संबंध नसताना उजनीतून २१ टीएमसी पाणी देण्याची तरतूद केली ती रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी तांबिले यांनी केली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जो इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या आम्ही सर्वजण समर्थन करत असून भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापुर तालुक्यातील गावांना पाणी मिळवून देऊ असे तांबिले यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, ज्येष्ठ नेते हनुमंतराव जगताप, माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी तरंगे,मनोहर भोसले, श्रीमंत खबाले.महेंद्र काळे,भारत चंदनशिवे,संजय खामगळ,गणेश चंदनशिवे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय यांचा प्रयत्न यशस्वी होणार..
यावेळी बोलताना माजी सरपंच व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाजी तरंगे म्हणाले की राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी २२ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु तो काही लोकांनी हाणून पाडला.
परंतु राज्यमंत्री भरणे हा प्रश्न नक्कीच सोडणार याची आम्हाला खात्री आहे