“होम आयसोलेट’ करोनाबाधितांसाठी वैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ला
पिंपरी – शहरामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि उपलब्ध बेड्सची क्षमता पाहता ज्यांच्या घरी अलगीकरणाची सोय आहे आणि ज्यांच्यामध्ये करोनाची अतिसौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांना घरीच उपचार घेण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा रुग्णांची संख्याही मोठी आहे. अशा रुग्णांनी करोनाचा अहवाल सकारात्मक आला तरी घाबरून न जाता रुग्णांनी प्रोटीनयुक्त आहार घ्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 68 हजारांचा टप्पा पार केला आहे. लक्षणे नसलेल्या तसेच अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय राज्य शासनाने दिला आहे. त्यासाठी रुग्णांना घरी स्वतंत्र खोली, स्वतंत्र टॉयलेट असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रुग्णांचे वय, आरोग्य आणि जुने आजार लक्षात घेता आहारामध्ये कोणताही निष्काळजीपणा रुग्णांनी करू नये. सकस आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती चागंली तयार होते. रोगप्रतिकारक पेशी जास्त प्रमाणात तयार होतात.
वैद्यकीय तज्ज्ञाच्या माहितीनुसार करोनाबाधित रुग्णांना पचण्यास हलका आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहार देणे. त्यासोबत रुग्णांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. व्हिटॅमिन सी आणि डी चा शरीराला पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासोबतच गरम पाणी, ताज्या भाज्या, खिचडी आणि हलक्या डाळींचा समावेश आहारामध्ये करायला हवा. त्यामुळे रुग्णांच्या शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते. तसेच यामुळे थकवा दूर होतो.
यासोबतच जेवणामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवयाला हवे. मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास बल्ड प्रेशरची समस्या निर्माण होते. अतितिखट, मसालेदार व जास्त गोड पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे.
ताज्या भाज्या खा – डॉ. अभय तांबिले
डॉक्टरांची संघटना असलेल्या “निमा’चे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी सांगितले की, करोनाबाधित रुग्णांना सकस आहाराची जास्त आवश्यकता आहे. रुग्णांनी आहारामध्ये प्रोटीनची मात्रा वाढवायला हवी. पचनासाठी हलका आहार घ्यावा. तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावते. आहारामध्ये अंड्यांचा समावेश करावा. यासोबतच ताज्या भाज्या खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डाळींचाही समावेश असावा, ताज्या फळांचे सेवन करावे. रोज ताजे अन्न खावे, शिळे पदार्थ खाऊ नये.
योगासने व व्यायामाला महत्त्व द्या -डॉ. पवन साळवे
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी -डॉ. पवन साळवे यांनी सांगितले की, करोनाबाधित झाल्यानंतर शरीराची हालचाल होणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकवेळा रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यानंतर अंथरुणामध्येच राहतात. ही अतिशय चुकीची बाब आहे. तुमच्या शरीराची हालचाल होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी व्यायाम व योगासने महत्त्वाची आहेत. पॉझिटिव्ह आल्यानंतर तुम्ही घऱामध्ये उपचार घेत असाल तर योगसने करा.